बिदाल – परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके मातीमोल होऊन बसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दमदार झालेल्या परतीच्या पावसाने शेतात आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे या रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर गेल्या असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन त्याची परिस्थिती हलाकीची झाली आहे.
तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळ पडला होता. त्यामुळेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न उपस्थित झाला होता. जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेकडो टॅंकरच्या मदतीने पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर पशुधनासाठी गावोगावी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यंदा मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर पेरण्या करण्यात आल्या होत्या. रिमझिम पावसाने पिके चांगली भरात आली होती. मागील पंधरा ते वीस दिवस सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शेतीतील पिकाचे मोठे नुकसान झाले.
त्याचबरोबर शेतात आजही भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे.या पावसाने जरी दुष्काळ हटला असला तरी ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतात आजही पाणी साचलेले असल्याने शेतास वापसा येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापल्याचे दिसत आहे. तात्काळ प्रशासनाकडून शेतकऱ्याला मदत मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.