दुधेबावी – फलटण येथील भूबाधीत शेतकऱ्यांना आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग क्र 965 बाधीत बाळू पाटलाचीवाडी ते राजुरी या 60 किलोमिटर भूसंपादनाची भरपाई अद्यापही मिळाली नसुन बाधीत शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. या निषेधार्थ बाधीत शेतकऱ्यांनी बुधवारी तहसिलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दोन ते तीन वेळा श्री. चिटणीस साहेब यांनी फलटण येथे येवून तुमच्या प्रश्नांचे एका महिन्याच्या आत निराकरन करतो असे आश्वासन दिले होते. परंतु नुकसान भरपाई विषयी कोणतेही निराकरण केले नाही. सदर संपादन भूमिलेख अधिकारी यांनी एकतर्फी मोजणी केली होती. मात्र सदर मोजणीची शेतकऱ्यांना माहिती दिली गेली नव्हती. मोजणीवेळी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
मोजणी होऊन दोन वर्षे उलटले तरी कोणत्याही गोष्टीचे निरसर केले नाही. सदर बाधीत शेतकऱ्यांच्या सात बारावर आळंदी पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग क्र 965 साठी राखीव क्षेत्र असा नामोल्लेख नमुद आहे. शेतकऱ्यांना प्रथम नुकसान भरपाई देण्यात यावी नंतरच नोंद करता येईल. सातबारा वरील नोंद ही नियमबाह्य आहे. बेकायदेशीर असून लवकरात लवकर बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी किंवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र 965 राखीव क्षेत्र ही नोंद रद्द सातबारा वरून कमी करावी, अन्यथा येत्या 21 तारखेला फलटण पंढरपूर रोड विडणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.