माहिती सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांची राज्यपालांकडे मागणी
शिक्रापूर – महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्य अर्थात आमदारांना कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नये, अशी मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे भीषण सुकाळ पसरलेला असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकार स्थापन होणे गरजेचे होते. परंतु अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटला नसल्यामुळे नुकतीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे.
राष्ट्रपती राजवट सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा सदस्यास कोणतेही काम करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार सरकार स्थापन होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या कोणत्याही विधानसभा सदस्य अर्थात आमदारांना कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नये, अशी मागणी गव्हाणे यांनी पत्राद्वारे केली आहे.