महापालिकेचा सज्जड दम : मेट्रोमार्गावरील कर्वे, पौड रस्त्यांची चाळण
पुणे – वनाज ते डेक्कन कॉर्नरपर्यंत महामेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे कर्वे रस्त्यासह पौड रस्त्याची चाळण झाली आहे. त्यानंतरही हे रस्ते दुरूस्त करण्याकडे महामेट्रो कानाडोळा करत असल्याने त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मेट्रोने तातडीने खराब रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा अपघात अथवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी त्यांची राहील असा सज्जड दम महापालिकेच्या पथ विभागाने भरला आहे. तसेच, तातडीने ही रस्ते दुरुस्ती करून त्याचा अहवालही महापालिकेस सादर करण्याच्या सूचना या पत्रात दिल्या आहेत.
पौड फाटा ते वनाज आणि डेक्कन कॉर्नरपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. या कामाचे खांब रस्त्याच्या मध्यभागी येत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस 9 मीटर आत बॅरिकेड्स लावण्यात आले असून उर्वरित रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. या कामात येणारे ड्रेनेज, केबल, जलवाहिन्या तसेच इतर सेवा वाहिन्या बाजूला करण्यासाठी मेट्रोकडून या रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. या खोदाईनंतर काम झालेल्या ठिकाणची दुरुस्ती तातडीने करणे ही महामेट्रोची जबाबदारी होती. त्यातच, यंदाच्या पावसाळ्यात पाऊस लांबल्याने या खड्ड्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्याबाबत नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून महापालिका आणि महामेट्रोकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मेट्रोची असताना त्यांच्याकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात आहे.
त्यामुळे विनाकारण महापालिकेस पदरमोड करून रस्ते दुरूस्त करावे लागत आहेत. या खराब रस्त्यांमुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत पालिकेने महामेट्रोला कळविल्यानंतरही त्यांच्याकडून पुन्हा दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे पालिकेने आता काही दुघर्टना घडल्यास त्याची जबाबदारी मेट्रोची राहील, असे स्पष्ट करत मेट्रोला चांगलेच सुनावले आहे.
या ठिकाणी झाली रस्त्यांची चाळण
गुजरात कॉलनी चौक, एमआयटी चौक, पौड फाटा चौक, आठवले चौक, नळस्टॉप चौक, स्वातंत्र्य चौक, खंडोजीबाबा चौक तसेच, या चौकांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस खड्डे असून कर्वे रस्त्यावर ठिकठिकाणी चेंबर रस्त्यावर आली असून अनेक ठिकाणी पदपथही तुटलेले आहेत.
आता कोणतीही मदत नाही
नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने तसेच महामेट्रो दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजास्तव या रस्त्याचे काम महापालिका करत आहे. मात्र, त्याचा आर्थिक भार पालिकेवर येत असून पालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या इतर कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेकडे असलेले अपूरे मनुष्यबळ तसेच यंत्रसामुग्री अभावी पालिका रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करणार नसल्याचे महापालिकेने महामेट्रोला कळविले आहे.