पडून असलेला साठा कमी करण्यासाठी वितरकांकडून प्रयत्न
पुणे – मागणी कमी झाल्यामुळे कार कंपन्या आणि वितरकांनी ग्राहकांसाठी बऱ्याच सवलती देऊ केल्या आहेत. पडून असलेल्या कारचा साठा म्हणजे इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी व भांडवल सुलभता वाढविण्यासाठी या योजना लागू केल्या जात आहेत.
मात्र तरीही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वितरकांची आर्थिक परिस्थिती खराब होऊ लागली आहे. त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला असल्याचे “ईक्रा’ या संस्थेने म्हटले आहे. पुढील काही महिन्यांत तरी वितरकांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नाही.
वितरकांना नव्या शोरूमसाठी किंवा खेळत्या भांडवलासाठी कर्ज मिळण्यात अडथळे येऊ लागल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. सध्या वितरकांचा नफा 5 वर्षांच्या निचांकी पातळीवर गेला आहे.
सवलती दिल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होणे सहाजिक आहे, असे “ईक्रा’चे उपाध्यक्ष आशिष मोदाणी यांनी सांगितले. यामुळे काही वितरकांना आपले काम बंद करावे लागले आहे. तर नव्या शोरूम उघडण्याची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर वितरकांकडून विक्रीही कमी झाली असल्याची आकडेवारी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार बाळगण्याचा खर्च वाढला
खेड्यातून कमी मागणी आणि मंदीमुळे कार सारख्या तुलनेने महाग वस्तूंची विक्री कमी होत असल्याचे दिसून येते. सुरक्षाविषयक मानदंड, उत्सर्जन विषयक मानदंड, विमा या कारणामुळे कार बाळगणे महाग झाले आहे. त्याचबरोबर इंधनाचे दरही जास्त पातळीवर असल्यामुळे ग्राहकांना कार खरेदी करणे महागात पडते. गेल्या काही वर्षांपासून ओला, उबेर सारख्या कंपन्या कार खरेदी करीत होत्या. मात्र, त्यांच्याकडून खरेदी स्थिरावली आहे.