प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना आदेश
पुणे – यंदा राज्यभरात पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला. विविध भागाला पुराचा फटका बसला, तर बहुतांश नद्या व धरणे भरले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्याकडे वळतात. त्यात विद्यार्थ्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विद्यार्थी पाण्यापासून काळजी घ्यावी, पाण्यापासून दूर रहावे, याबाबत सर्व शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी आवाहन करावेत, अशा सक्त आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व भागात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यात मोठ्या पावसामुळे सर्व धरणे, नदी, नाले आणि विहिरी तुंडुब भरल्या आहेत. अशा परिस्थितीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याचे वृत्त येते. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा संचय आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवू नये. त्यापासून कसे दूर ठेवता येईल, त्याबाबत सूचना सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमार्फत पालकांना द्यावेत, असेही प्राथमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे. यासंदर्भात पुणे विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांची तीन दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली होती. त्यात सर्व अधिकाऱ्यांना पाण्यात विद्यार्थ्यांचे होणारे मृत्यू यावर चिंता व्यक्त करण्यात आली.
पुढील काळजी घ्या
नदी, धरणांपासून मुलांना दूर ठेवा
मुलांना पोहण्याची कला अवगत करा
पाण्यापासून सावध राहा
सर्पदंश होऊ नये, यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाई करा