गुंतवणूकदारांच्या गटात चर्चा : विविध मार्गाने पाठपुरावा करणार
पुणे – डीएसकेंच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचा एक गट आता मोठे रूप घेऊ लागला आहे. या गटातील सदस्यांची संख्या वाढू लागली आहे. इतर अनेक मार्ग अवलंबण्याबरोबरच ठेवी परत मिळविण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणमध्ये (एनसीएलटी) याचिका दाखल करण्याच्या शक्यतेवर विचार सुरू आहे.
गुंतवणूकदारांच्या गटाची दर आठवड्याला रविवारी बैठक होते. यातून चैतन्य सेवाभावी संस्था आकाराला आली. या संस्थेचे नेतृत्व या प्रकरणाचा बराच पाठपुरावा केलेले दीपक फडणीस करीत आहेत. या बैठकीमध्ये न्यायाधिकरणात जाण्याच्या शक्यतेवर अनेक सदस्यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. “एनसीएलटी’मध्ये गेल्यानंतर हा प्रश्न कसा असू शकेल, त्यासाठी किती वेळ लागेल यासंदर्भात या गटांत सक्रिय असलेले शरद नातू फडणीस यांनी विविध ज्येष्ठ वकिलांशी विचार विनिमय केला आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी “एनसीएलटी’मध्ये गेल्यानंतर किती कालावधी लागू शकतो, यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच सदस्यांनी “एनसीएलटी’मध्ये जाण्यासाठी आवश्यक ते योगदान करण्याची इच्छा बोलून दाखविली. ठेवी परत मिळण्यासाठीचा लढा अनेक पातळ्यांवर द्यावा लागणार आहे. त्यासाठी बरेच स्वयंसेवक पुढे आले असून ते या संबंधातील विविध प्रकरणांचा पाठपुरावा करीत आहेत. त्यासंदर्भात 16 तारखेला न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी बरेच ठेवीदार उपस्थित राहणार आहेत. डीएसकेंच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेले अनेक ठेवीदार आहेत. ते राज्यभर विखुरलेले आहेत. समाजमाध्यमाच्या माध्यमातून त्यांना एकत्रित केले जात असून त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे फडणीस यांनी सांगितले.
मुदतठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे मागण्यासाठी गेले असताना त्यांना कसे कसे अनुभव आले याचे गाऱ्हाने ठेवीदार या बैठकीमध्ये मांडत असतात. त्याचबरोबर पीएमसी बॅंकेच्या ठेवीदारांना अंशतः तरी काही प्रमाणात लवकर न्याय मिळाला. मात्र, आपल्या प्रकरणाकडे समाजाकडून आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना काही ठेवीदार व्यक्त करतात.
अनेक ज्येष्ठ ठेवीदारांची परिस्थिती खराब
बैठकीला शहराच्या विविध भागांतून बरेच वय झालेले ठेवीदार येतात. त्यांना शिवाजीनगर येथे येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही यातून काही मार्ग निघेल या आशेने हे ठेवीदार येत असतात. त्यातील अनेकांना वयोमानाप्रमाणे अनेक व्याधी झालेल्या आहेत. मात्र, उपचारासाठी पैसे नाहीत असे हे ठेवीदार सांगतात. काहीवेळा ते भावनिक होतात तर, वृद्धत्व आणि आजारामुळे बरेच ठेवीदार या बैठकीला येऊ शकत नाहीत.