अच्युत गोडबोले; हिरवाई प्रकल्प म्हणजे साताऱ्यातील नंदनवन
सातारा – हवामानात दरवर्षी होणाऱ्या बदलाचे कारण विकासनीती असून जागतिकीकरणानंतर बिल्डर, कार्पोरेट क्षेत्रांतील लॉंब्यांचे अतिक्रमण यामुळे शहरांची वाट लावली, याच विकासनीतीमुळे हवामान बदल होत आहेत, असे संगणकतज्ज्ञ, ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी येथे स्पष्ट केले. हिरवाई प्रकल्प म्हणजे साताऱ्यातील नंदनवन असल्याचे सांगून आकाशाला भिडणारी झाडे आनंद देतात, असेही त्यांनी सांगितले.
येथील हिरवाई प्रकल्पाच्या वतीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांना श्री. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर, “साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. सोमनाथ साबळे, राजेंद्र चोरगे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. अशी हिरवाई बहरण्याचे काम येथे झाले असून त्यासाठी मोठे धैर्य लागते, असे सांगून गोडबोले म्हणाले, “”आज विकास नीतीमुळे कामे करताना कोणतेही परिमाण (स्टॅंन्डर्ड) न पाळल्यानेच हवामान बदलाचा परिणाम झाला आहे.
जागितिकीकरणानंतर कार्पोरेट क्षेत्रासह बिल्डर लॉब्यांनी शहरांची वाट लावली. फ्लाय ओव्हर झाले म्हणजे प्रगती झाली म्हणतात. परंतु, ती अधोगती आहे.” आजचा हा कार्यक्रम म्हणजे हिरवाईत जिवंत झालेली कविता आहे, असे सांगून श्री. मुळे म्हणाले, “”आपण झाडांना अवकाश देतो हे खरे नसून झाडेच आपणाला अवकाश देत असतात. प्रत्येक माणसात महावृक्ष बनण्याचे बीज असते. त्याला खतपाणी
देऊन मोठे कसे करता येईल, ते महत्त्वाचे असते. निसर्गात वैविध्य आहे. विषमता नाही.
माणसाने निर्माण केलेली विषमता भयानक असते. भूक, घर, शिक्षण, मुलभूत गरजा यात विषमता निर्माण झाली.” अनेक देशांमध्ये मी काम केले परंतु बदललो नाही, असे सांगून श्री. मुळे यांनी महाराष्ट्रात सुधारणा चळवळ झाल्याने महाराष्ट्रातील जडणघडणीचा फायदा मला झाला. बौद्धिक रसद मला पुरविण्याचे काम महाराष्ट्राने केले, असे त्यांनी स्पष्ट केले.
विनोद शिरसाठ, दत्तप्रसाद दाभोळकर यांची भाषणे झाली. काम करताना अनेक अडचणी आल्या तरी अनेकांनी प्रोत्साहनही दिले, असे प्रा. संध्या चौगुले यांनी प्रास्ताविकात सांगितले. पांडुरंग चौगुले यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे सामाजिक काम उभे राहिले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कांचन कोळी यांनी सूत्रसंचालन केले. श्री सेवागिरी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. सरिता शिंदे, मनीषा मोरे व शुभांगी मुळे यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. धनंजय चौगुले व वैभव लोटके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वनिता बाबर यांनी आभार मानले.