मुख्याध्यापक व पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी
पुणे – विधानसभा निवडणुका, दिवाळी सुट्टी व इतर साप्ताहिक सुट्टयांमुळे इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थ्यांची अपेक्षित नोंदणी करता आलेली नाही. यामुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शाळांच्या मुख्याध्यापक व पालकांकडून होऊ लागली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 16 फेब्रुवारी रोजी राज्यात सर्वच जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळांकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज भरावे लागणार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या कामकाजासाठी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. निवडणुकीचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामकाज यात ते व्यस्त होते. निवडणुकांचे कामकाज पूर्ण झाल्यामुळे आता त्यांची सुटका झाली आहे. त्यानंतर लगेच दिवाळीच्या सुट्टया लागल्या. यामुळे बऱ्याचशा शाळांमध्ये अद्यापही शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली नाही ही बाब उघडकीस आली आहे.
गेल्या वर्षीच्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थ्यांची नोंदणी अधिकाधिक व्हावी यासाठी राज्य परीक्षा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय यांच्यास्तरावरून योग्य ते प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 3 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. 10 ते 12 लाखांच्या पुढे त्यात वाढ होण्याची अपेक्षा धरण्यात आलेली आहे.