2020 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार : गजेंद्रसिंग शेखावत
पुणे – देशातील जलव्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेता, जलशक्ती मंत्रालयाने देशातील पाण्याच्या स्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. याचा पहिला टप्पा 2020 पर्यंत पूर्ण होईल, तर उर्वरित काम त्यापुढील दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी दिली.
जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत पुण्यात “शाश्वत पाणी व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित दुसरी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शेखावत बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, प्रकल्प समन्वयक अखिल कुमार, ऑस्ट्रेलियन दुतावास टोनी हुबेर, दीपक कुमार, जलसंपदा सचिव राजेंद्र पवार, अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, मुख्य अभियंता वी. जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जलविज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द. भगत उपस्थित होते. “इंडिया डब्लुडब्लूआरएस’ डाटा एन्ट्री या मोबाइल ऍप, “कुकडी इरिगेशन रोटेशन’ ऍपचे उद्घाटन आणि “जलदूत’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
शेखावत म्हणाले, “वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. देशात प्रदेशनिहाय पाण्याची स्थिती बदलते आहे. यावर जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करून 2024 पर्यंत प्रत्येक घरात पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्याचा आमचा मानस असून, जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’