नवी दिल्ली : कर्तारपूर कोरिडोरच्या उद्घाटनापुर्वी तेथील व्यवस्था आणि राजशिष्टाचाराची पहाणी करण्यासाठी एका पथकाला परवानगी देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने फेटाळून लावली. केवळ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊ देऊ, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे, असे केंद्र सरकारच्या वरीष्ठ सूत्रांनी सांगितले.
भारतीय भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानने घेतली आहे. या यात्रेत खलीस्तानवादी घुसू नयेत आणि भारत विरोधी कारवाया घडू नयेत, अशी काळजी भाविकांची सुरक्षा पाहणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणेने घ्यावी, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. पाकिस्तानात जाणाऱ्या पहिल्या जथ्थ्यामध्ये अनेक मान्यवरांचा समावेश अहे. त्यात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, केंद्रीय मंत्री हर्सीम्रत बादल आणि हरदीप पुरी यांच्यासह 150 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. पाकिस्तानने पहिला जथ्था हा या उपक्रमाच्या उद्घाटनाचा सोहळा असावा अशी विनंती केली आहे, असे या सुत्रांनी सांगितले.
सीख फॉर जस्टीस या संस्थेच्या भारत विरोधी कारवायांमुळे भारत चिंतीत आहे. त्यामुळे कर्तारपूरला भेट देणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना सर्वोच्च सुरक्षा द्यावी,अशी मागणी भारताने केली आहे. भारत आता पाकिस्तान दिल्या वचनाला कसा जागतो? याकडे लक्ष ठेवून आहे. भारतातून येणारा भाविकांचा पहिला जथ्था हा उद्घाटन समारंभाचा भाग असेल, असे पाकिस्तानने म्हटले असले तरी त्याबाबतचा अधिकृत कार्यक्रम अद्याप भारताला पाठवला नाही. त्यातच पाकिस्तानात असणाऱ्या सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचे सावटही या समारंभावर आहे.