मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसून, शिवसेना मुख्यमंत्री पद आणि सत्तेत निम्मा वाटा या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे उद्या भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याचे भाजपने जाहीर केलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत “भाजपने सरकार स्थापन करावे याचीच शिवसेना वाट पाहत होती”असे वक्तव्य केले आहे.
या वेळी बोलताना राऊत म्हणाले की सर्वाधिक बहुमत असलेला पक्ष भाजपच असल्याने त्यांनी सत्तास्थापनेसाठी दावा करायलाच हवा. उद्या त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन १४५ आमदारांच्या यादी द्यावी आणि सरकार स्थापन करावे त्याचे आम्ही स्वागतच करू.
तसेच अद्याप भाजपशी कुठलीही चर्चा झाली नसून काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी माझे फोनवर बोलणं झाले असल्याचा खुलासाही राऊत यांनी केला आहे. त्याच बरोबर उद्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलाविण्यात आली असल्याने या बैठकीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हटले आहेत की लवकरच गोड बातमी येईल, तर ती गोड बातमी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार अशी असेल आणि ती मुनगंटीवारच देतील असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान आज संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्याशी देखील भेट झाली आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र आहे.