– रामकुमार आगरवाल
देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंचपद पुन्हा एकदा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एका पंचवार्षिकेत होणारे सहावे सरपंच आणि सातवे उपसरपंच ठरविण्याचा “विक्रम’ नोंदविले जातील. तुकोबांच्या देहुनगरीत आता लोकप्रतिनिधी खुर्चीसाठी राजकारण करतात की जनतेसाठी समाजकारण असा प्रश्न यानिमित्ताने देहूकरांनी उपस्थित केला आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथे जून 2015 रोजी देहू ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ग्रामपंचायत ही सतरा सदस्यीय आहे. 17 सदस्यांची मोठी ग्रामपंचायत म्हणून देहूची गणना आहे. राज्य शासनाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चारशेव्या जन्म सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र देहूचा कायापालट करण्यासाठी विकास आराखडा राबविला. या विकास आराखड्या अंतर्गत विविध कामे राज्य शासन करीत आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदानासाठी देहू मावळ विभागात जोडला गेला आहे. तसेच अन्य सर्व कामकाजासाठी हवेलीमध्ये मोडली जाते. निवडून आलेल्या 17 लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मुलभूत समस्या सोडविणे आणि समाजकारण करण्यापेक्षा खुर्चीचे राजकारण केल्याचे सध्याचे चित्र आहे.
देहू ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित असताना निवडून आलेल्या नऊ महिला सदस्यांपैकी अद्यापपर्यंत पाच सरपंच, तर एक उपसरपंच महिला झाले आहेत. अनुक्रमे हेमा मोरे, सुनीता टिळेकर, उषा चव्हाण, ज्योती टिळेकर यांनी चार वर्षांत सरपंचपद भूषविले. नुकतेच पाच महिन्यांपूर्वी पूनम विशाल काळोखे या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. तसेच उपसरपंचपदी अनुक्रमे अभिजित काळोखे, सचिन कुंभार (साळुंके), दिनेश बोडके, संतोष हगवणे, राणी मुसूडगे यांनी पद भूषविल्यावर निलेश घनवट पदावर विराजमान आहेत.
या पंचवार्षिकेचा सहा महिन्याचा कालावधी उर्वरित असताना सरपंच आणि उपसरपंच पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. उर्वरित लोकप्रतिनिधी पैकी दिपाली जंम्बुकर, ज्योती साळुंखे आणि रत्नमाला करंडे, तर सचिन विधाटे, स्वप्नील काळोखे, नरेंद्र कोळी यापैकी कोणाची सरपंच व उपसरपंचपदी वर्णी लागणार की सहा महिन्यात सर्वांचेच पाट्या लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरपंच, उपसरपंच व विविध क्षेत्रात निवड झाल्यानंतर निवासाकडे दर्शविणाऱ्या पदपथावर अतिक्रमण करून उभारलेल्या फलक, विविध समारंभात शाल, श्रीफळ व व्यासपीठावर बसण्यासाठी, प्रतिष्ठा यासाठी लोकप्रतिनिधीत्व करायचे आहेत का ? तर ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेली संगीत खुर्ची त्याचबरोबर लोकप्रतिनिधी खुर्चीसाठी की समाजसेवा करण्यासाठी असा प्रश्न देहूकर करू लागले आहेत. गावातील ज्येष्ठ नेतेमंडळींनी याकडे लक्ष दिले पाहिजे. हे थांबविले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांना फलकांचे वास्तव समजेना…
गावात पदपथ अथवा रस्त्यांवर ठिकठिकाणी उभारलेल्या लोकप्रतिनिधींच्या फलकावरील सरपंच, उपसरपंच, तर विविध क्षेत्रात असणारे पदाधिकारी सर्व “आजी’च असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देहूत सरपंच, उपसरपंच व अन्य पदाधिकारी किती आणि नक्की कोण ? असा संभ्रम निर्माण होत आहे. सद्यस्थितीतील असणारे पदाधिकारी वगळता अन्य फलकांवर कारवाई करून जागा रिक्त करण्याची मागणीही आता नागरिकांमधून होत आहे. तर जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे नागरिकांकडून सुचविण्यात आले आहे.
देहूगावात समस्यांचे भिजत घोंगडे…
नागरिकांच्या प्रमुख मुलभूत नागरी सुविधा असणाऱ्या कचरा निर्मूलन, साफसफाई, औषध फवारणी, पाणीपुरवठा, बंद पथदिवे, नादुरुस्त व खड्डेमय रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृहे, पदपथावरील अतिक्रमणे, विकास कामांकडे दुर्लक्ष, वाहतूक कोंडी, देहूत दिवसेंदिवस वाढणारे बकालपणा, चौका-चौकांत लागणारे फ्लेक्समुळे होणारे विद्रुपीकरण, आठवडा बाजारात वाढणारे चोऱ्या, दिवसा आणि रात्रीही होणारी घरफोड्या, महिलांच्या दागिन्यांची लुटमारी, वाढते परप्रांतीय “पेइंग गेस्ट’ आणि भाडेकरूंची वाढणारी संख्या त्यांच्या नोंदी, बेकायदेशीर उभी होणाऱ्या गृहप्रकल्पांसह, बांधकामे, पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष, इंद्रायणी नदीतील वाळू उपसा, शासकीय जमिनीवरील टेकड्या फोडून होणारे मुरूम चोऱ्या, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, गावात वाढणारी अवैध धंदे, व्यवसाय अशा विविध समस्या दिवसेंदिवस वाढत असताना लोकप्रतिनिधींचे याकडे होणार दुर्लक्षित हाच चिंतनाचा विषय ठरला आहे.