यवतमाळ: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्यामुळे सध्या राज्यात पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या सततच्या वादळी पावसाने कपाशी व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील आकोली (गोपालपूर) येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे.
मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. सतिश गुणंतराव खटाळे असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. सतिश खटाळे यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीन लागवड केली आहे.
या पिकांसाठी खटाळे यांनी खासगी व बँकेचे कर्ज काढले होते. या पैस्यातुन त्यांनी पिकांची जोपासना केली होती. परंतु अकाली पावसामुळे संपूर्ण पीकच उद्ध्वस्त झाले आहे.
पिकातून मिळणारे उत्पन्न तर दूरच पण कर्जाचा डोंगर वाढणार असल्याने खटाळे निराश झाले होते. आणि याचा त्यामुळे नैराश्यातून त्यांनी मंगळवारी दुपारी शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. खटाळे यांच्या मृत्यू ने परिसरात शोककळा पसरली आहे.