महामार्गावरील कॉंक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे अपघात वाढले
कुरकुंभ – केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अहमदनगर ते बारामती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, हा मार्ग कुरकुंभ-जिरेगाव या भागातून जातो. या मार्गावरील काही भागात सिमेंट कॉंक्रिटचे काम पूर्ण झाले असले तरी कुरकुंभ, जिरेगाव भागात मात्र हा रस्ता खोदलेल्या अवस्थेत तसाच आहे. पाऊस झाला की या रस्त्यावर चिखलाची घसरगुंडी तयार होते. आज (दि. 19) बारामतीच्या बाजूने नगरकडे जाणारा ट्रक रस्त्यावर उलटल्याची घटना घडली, दैव बलवत्तर म्हणून चालक थोडक्यात बचावला.
अहमदनगर-बारामती महामार्गावर जिरेगावच्या (ता. दौंड) हद्दीत बऱ्याच दिवसांपासून रस्ता खोदून ठेवलेल्या अवस्थेत आहे. आज (दि. 19) सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. पावसाच्या हलक्या सरीननंतर सकाळी दहाच्या दरम्यान पावसाने जोर धरत एक तास जोरदार हजेरी लावली. बऱ्याच दिवसाने परिसरात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. याला अपवाद ठरत कुरकुंभ-जिरेगाव हद्दीत नगर-बारामती महामार्गावर पावसाच्या पाण्याची डबके तयार झाली होती. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवजड वाहन उलटले होते. पाऊस झाला की या रस्त्यावर अशा घटना नेहमीच घडत असल्याचे चित्र आहे.
संबंधित विभागाचे दुर्लक्ष…
4 ऑगस्ट 2019 ला या ठिकाणी ट्रक उलटला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे प्रवाशांना तसेच विद्यार्थी व ग्रामस्थांना या अर्धवट रस्त्याचा सामना करावा लागत आहे. आज झालेल्या अपघाताने तरी संबधीत विभाग जागे होईल का, असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.
या मार्गावरील कुरकुंभ-जिरेगाव हद्दीत येथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी रस्त्याचे काम अडवले होते. मात्र, असा अर्धवट रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साहित्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. मात्र, अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.
– राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ