कोंढवा, दि. 11 (प्रतिनिधी) -पुणे-पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र.965 म्हणून जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण दुरुस्ती, रुंदीकरण, चौपदरीकरण अशी कामे होण्याऐवजी या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. हडपसर ते वडकी या मार्गावर विविध आकाराचे आणि खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचे प्रदर्शन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी भरवावे आणि मिळेल त्या जमा शुल्कातून दुरस्ती करावे, अशी उपरोधक प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महामार्ग क्र. 965 वर हडपसर ते वडकी, दिवेघाट सुरू होईपर्यंत रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. याबाबत येथील नागरिकांनी, संस्थांनी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आहेत. परंतु, मुरूम टाकणे, माती भरणे, डांबर शिंपडणे अशा जुजबी कामांशिवाय काहीही केले जात नाही. याउलट अशा अशास्रीय कामामुळे चिखल, राडारोडा तसेच दगड-गोटे पसरून रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे.
सासवड मार्गावर भेकराईनगर ते उरुळी देवाची दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने डांबराचा वापर न करताच मोठ्या खड्ड्यांचा मुरूम टाकून खड्डे बुजवले. परंतु, संततधार पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता पूर्णपणे वाहुन गेला आहे. आता, अशा पद्धतीने रस्त्यावरील खड्डे बुजविणार असला तर ते काम करू नका, अशी विनंती युवासेनेचे शादाब मुलाणी व राष्ट्रवादीचे सोमनाथ यादव यांनी केली आहे. खड्डे बुजविण्याची पद्धती म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर, अशी असल्याने या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.