लखनऊ : अखील भारतीय हिंदु महासभेचे नेते आणि आयोध्या प्रकरणातील एक पक्षकार कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांना सुरतमधून अटक केली.
गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस)शुक्रवारी सात संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी पुढील कारवाई केली. एटीएसने ताब्यात घेतलेले चार जण अहमदाबादमधील तर तिघे सुरतच्या लिंबायत भागातील आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करताना घटनास्थळावर सुरतमधील एक मिठाईचा बॉक्स सापडला होता. त्या प्रकरणी सुरत पोलिसांशी संपर्क साधल्यावर त्यांनी त्या दुकानात जाऊन चौकशी केली होती.
अटक केललेल्या तीन जणांची ओळख पटली आहे. त्यांची नावे : मौलाना शेख (वय 24) हा एका साडीच्या दुकानात काम करतो. फैझान (वय 21) हा बुटाच्या दुकानात काम करतो. तिसरा व्यवसायाने शिंपी असणारा 23 वर्षीय रशिद अहमद उर्फ रशद पठाण.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास द्या : मुलाची मागणी
आपल्या वडिलांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात यावा. माझा कोणावरही विश्वास उरलेला नाही. त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना त्यांची हत्या होते. मग मी प्रशासनावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल कमलेश तिवारी यांचे पुत्र सत्येन यांनी केला.
गुजरात कनेक्शन
गुजरात पोलिसांनी ऑक्टोबर 2017 मध्ये अटक केलेला इस्लामिक स्टेटस्चा हस्तक कासिम स्टींबरवाला आणि अबैद मिर्झा यांच्याकडून गुजरात पोलिसांना तिवारी यांच्या हत्येचा कटाचा सुगावा लागला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी या बाबतची कागद पत्रे ताब्यात देण्याची मागणी केली आहे.
अल्लाहविषयी कमलेश तिवारी यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्याचा बदला म्हणून कासिम आणि अबैद यांनी तिवारी यांच्या हत्येचा कट रचला होता, अशी कबुली या दोघांनी 26 ऑक्टोबर 2017ला दिली होती, असे गुजरात एटीएसचे महासंचालक हिमांशू शुक्ला यांनी दिली. हे दोघे सध्या अहमदाबादमधील साबरमती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.कासिम हा व्यवसायाने वकील आहे तर अबैद हा किरकोळ कामे करून उदरनिर्वाह चालवत असे, असे सुत्रांनी सांगितले.
जबाबदारी स्वीकारली
अल-हिंद ब्रिगेडने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. एका व्हॉट्स ऍप मेसेजद्वारे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. इस्लाम आणि मुस्लीमांविषयी बदनामीकारक वक्तव्ये करून तिवारी समाजात उपद्रव निर्माण करत आहेत. त्याला त्याच्याच पध्दतीने संपवू, असे त्यात म्हटले आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून या मेसेजबाबत दुजोरा मिळू शकला नाही.
घटनास्थळावरून
दरम्यान, तिवारी यांची हत्या झाली त्यादिवशी दोन युवक त्यांच्या निवासस्थानाबाहेर घुटमळताना दिसत आहेत. तिवारी यांची पत्नी किरण यांनी बीजनोर मशिदीच्या दोन मौलवींविरूध्द तिवारी यांच्या हत्येचा आणि कट रचल्याची फिर्याद दिली आहे. या दोघांनी 2015मध्ये तिवारी यांच्या मारेकऱ्यांना रोख इनाम जाहीर केले होते. घटनास्थळी सापडलेल्या पिस्तूल आणि काडतुसाची पुंगळी रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. तिवारी यांच्या मानेवर गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे लखनऊचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विकासचंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची भूमिका
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची नेमले असून त्यांनी या प्रकरणाचा अतिरिक्त गृहसचिव अवनिश अवस्थी आणि पोलिस महासंचालक सिंग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. दोषींची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.