महाआघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांचे आश्वासन
खडकी – खडकी येथील लष्करी दारूगोळा कारखान्याच्या खासगीकरणच्या भूमिकेविरुद्ध आपण सातत्याने आवाज उठविला आहे. यापुढेही दारूगोळा कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाइं (कवाडे गट) उमेदवार दत्ता बहिरट यांनी कामगारांशी संवाद साधताना सांगितले.
बहिरट यांनी शुक्रवारी ऑर्डनन्स कामगारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष मनीष आनंद, मनोज भोरे, राजेंद्र भुतडा यांच्यासह इंटकचे पदाधिकारी सहभागी होते.
लष्करी दारुगोळा कारखान्यातील कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचे पगार वेळेवर होत नाहीत. दीपावली जवळ आली आहे, तरीहही अनेकांच्या बोनसचा प्रशन प्रलंबित आहे. काही कामगारांनी सांगितले, की या कारखान्यांचे खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असून त्याला आमच्या संघटनांनी विरोध केला आहे. तर कारखान्यांचे कोणत्याही परिस्थिती खाजगीकरण होऊ देणार नाही, ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे. पक्षाने याविरुद्ध कामगारांच्या आंदोलनात सहभागही घेतला आहे.
वेळ पडल्यास भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, अशा शब्दांत आपण कामगारांच्या सोबत असल्याचा विश्वास बहिरट यांनी कामगारांना दिला.
खिलारे वस्तीत जोरदार प्रतिसाद
दत्ता बहिरट यांनी कर्वे रस्त्यावरील खिलारे वस्ती व सोसायट्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक शिवा मंत्री, चित्रसेन खिलारे, राजाभाऊ साठे, हनुमंत पवार, अजय मारणे, उमेश कंधारे, निरंजन जगताप, संजय लाड, दिलीप इंगळे, प्रशांत वेलणकर, शिवाजी पाडाळे, संजय लाड, लाला कानगुडे, प्रणाली सोनावणे, योगीराज खिलारे, प्रदीप ठोंबरे, कमल साठे, रमेश धावडे, सुहास रानवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.