रामटेकडी, वैदूवाडी परिसरात संवाद दौरा
हडपसर – भाजप-सेना सरकारच्या काळात रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, हडपसर भागात नवीन कचरा प्रकल्प लादले गेले. यामुळे दुर्दैवाने हडपसरची ओळख मागील काही वर्षांत कचरानगरी अशी झाली आहे. माझ्या या भागाची ओळख बदलण्याचा मी निर्धार केला असून आमदार झाल्यानंतर इथले कचरा प्रकल्प हटविणार आणि यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले.
रामटेकडी, वैदूवाडी परिसरात त्यांनी गुरुवारी जनतेशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या हाती सत्ता आली, तेंव्हा आम्ही लोकांची कामे केली आहेत. आघाडीची सत्ता आली तर आम्ही भौतिक सुविधा नक्कीच देणार. शहराचा सुनियोजित विकास साधणार. ग्रामीण भाग असो व शहर शरद पवार साहेबांनी नेहमीच लोक हिताच्या कामांना महत्त्व देऊन जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. आम्ही त्यांचाच विचार पुढे घेऊन जात आहोत, असेही चेतन तुपे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
यावेळी नगरसेवक आनंद अलकुंटे, दशरथ शिंदे, हनु तुपे, संजय डोंगरे, विलास अलकुंटे, राजू कोंडे, ऍडव्होकेट अस्लम, मख्खन सिंग, संजय तुपे, निजाम शेख, मारुती धुमाळ आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, रिपाइं जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
रामटेकडी भागातून सर्वाधिक मताधिक्य देऊ : आनंद आलकुंटे
हडपसर मतदार संघात सुनियोजित विकासासाठी महाआघाडीचा आमदार याठिकाणी पाहिजे. त्यामुळे रामटेकडी येथील नागरिक हे मोठ्या मताधिक्याने आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना निवडून देतील, असा विश्वास नगरसेवक आनंद अलकुंटे यांनी व्यक्त केला.