मुख्यमंत्री फडणवीस यांचा शरद पवारांवर घणाघात
वरवंड- शरद पवार म्हणतात मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. मी अनेक पहिलवान तयार करतो, पण पवार साहेब एकही पहिलवान का तुमच्या सोबत राहत नाही? याचे कारण काय? आज उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला दाखवायलाही पहिलवान राहिलेला नाही. सगळ्या मतदारसंघात तुम्हालाच जावे लागते, ही अवस्था तुमच्या पक्षाची का झाली? अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर केली.
दौंड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ चौफुला येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. यावेळी आमदार राहुल कुल, कांचन कुल, भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, तालुक्याच्या माजी आमदार रंजना कुल, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, हरिष खोमनर, दौंडच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया, राजाराम तांबे, अनिल सोनवणे, तानाजी दिवेकर, दौलत शितोळे, दौंड तालुका अध्यक्ष गणेश आखाडे, महेश भागवत, आनंद थोरात, सदानंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे आमचे उमेदवार निवडून येतात. राहुल गांधी महाराष्ट्रात आले आणि भाषणात म्हणाले 70 वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होतोय 70 वर्षांपासून तुमचे कामे होत नाहीत, 70 वर्षांपासून भ्रष्टाचार चालला आहे; परंतु राहुल गांधी यांच्या लक्षातच येत नाही की आज 70 वर्षांपैकी 60 वर्षे त्यांच्याच कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या लक्षातच आले नाही की राहुल गांधी आपल्यासाठी भाषण द्यायला आले की विरोधी पक्षांसाठी? अशी खोचक टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
- दौंड तालुक्याचा कायापालट करण्याची निवडणूक आहे. मुळशीचे पाणी दौंडकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली, त्या समितीकडून सध्या काम सुरू असल्याने तालुक्याची पाणीटंचाई कायमची दूर करण्यासंदर्भातील ही निवडणूक आहे. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी दीड हजार एकर जागेत चौफुला परिसरात एमआयडीसी होणार आहे. याचा आराखडा तयार होत आहे. पुणे-दौंड लोकलचे विद्युतीकरण का झाले नाही, हा प्रश्न सर्वांनाच आहे; परंतु पुणे-दौंड लोकल विद्युतीकरण करून तालुक्याचा कायापालट करण्यासंदर्भातील ही निवडणूक आहे.
– राहुल कुल, आमदार