वरवे खुर्द येथील सभेत आमदार संग्राम थोपटेंचा राज्यमंत्र्यांना इशारा
भोर – गुंजवणी धरणाचे पाणी सासवड पुरंदरला देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, जर कोणी पाण्याचे राजकारण करणार असेल, तर आमच्या भोर तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी सर्वप्रथम मिळाल्याशिवाय गुंजवणी धरण प्रकल्पातील पाण्याचा एकही थेंब पुढे जावू देणार नसल्याचा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिला आहे.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे, वरवे बुद्रुक-खुर्द, कांजळे, देगाव, नायगाव, खडकी, कामथडी, कापूरहोळ, दिवळे, निगडे, धांगवडी, मोरवाडी, केंजळ, किकवी आदी 24 गांवचा गावभेट प्रचार दौरा केला. त्यावेळी वरवे खुर्द येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, पंचायत समिती सदस्य रोहण बाठे, राजगडचे संचालक के. डी. सोनवणे, पोपटराव सुके, राजगडचे उपाध्यक्ष विकास कोंडे, चंद्रकात सागळे, राष्ट्रवादीचे नीलेश भोर्डे, महेंद्र भोर्डे, सुरेश मोरे, संजय कांबळे आदींसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, महामार्गावरील गावागावांत विरोधक दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आज आघाडी सरकारची गरज आहे. महामार्गावरील शिवापूर टोल नाक्यावार स्थानिकांना टोल माफीसाठी आम्ही आंदोलान करीत आलो; पण विरोधक याचा फायदा घेवून आर्थिक लुट करीत आहेत. हे जनता ओळखून आहे. शनिवारी (दि. 19) राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची कापूरहोळ येथे जाहीर सभा होणार असून राज्यात आघाडीचेच सरकार येण्याचे हे संकेत आहेत.
यावेळी आमचं ठरलयं!
आम्ही आघाडी धर्माचे पालन करून कोणत्याही दबावाखाली न राहता आमदार संग्राम थोपटे यांनाच विजयी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे महेंद्र भोर्डे यांनी सांगितले. तर देगाव येथील प्रचारसभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राजगडचे माजी संचालक आबासाहेब यादव व गोरख यांनी युती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.
आमदार संग्राम थोपटे यांच्या लोकप्रियतेमुळे गावागांवात मतदार ढोल-ताशा लावून त्यांचे स्वागत करीत आहेत. टोल लुटण्याचे काम या भागातील काही विरोधक काम केले आहे. छत्रपतींचे नाव घेऊन दसरा मेळाव्यात बॅनरवर साधा शिवरायांचा फोटोही न छापणारे हे महायुतीचे सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या या सरकारने एकही रुपया माफ केलेला नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवरुन हाटवण्यासाठी मतदारराजा सज्ज झाला आहे.
– शैलेश सोनवणे, भोर तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस