छाननीअंती 9 उमेदवारांचे 13 अर्ज धरले ग्राह्य
मंचर – आंबेगाव विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची घोडेगाव तहसील कार्यालयात शनिवारी (दि. 5) छाननी करण्यात आली. यामध्ये मंगलदास बांदल, अरुण गिरे व ऍड. लक्ष्मण डामसे यांचे तीन अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी 9 उमेदवारांचे 13 अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
मंगलदास बांदल यांनी अर्जाला शपथपत्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अधिकृत एबी फॉर्म व वयाचा पुरावा जोडला नसल्याने, अरुण गिरे यांनी शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने, तर वंचित बहुजन विकास आघाडीचे ऍड. लक्ष्मण डामसे यांनी नवीन प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, पूर्ण फॉर्म भरलेला नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
तर दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी), राजाराम भिवसेन बाणखेले (शिवसेना), वैभव दत्तात्रय बाणखेले (मनसे), नाथू हरिभाऊ शेवाळे (जनता दल-सेक्युलर), रवींद्र बाबुराव चव्हाण (बहुजन समाज पार्टी), संजय लक्ष्मण पडवळ (भारतीय नवजवान सेना), विशाल पोपट ढोकले (राईट टू रिकॉल पार्टी), अशोक दत्तात्रय काळे पाटील, अनिता शांताराम गभाले (दोघे अपक्ष) यांचे अर्ज ग्राह्य झाले आहेत.