– एन. आर. जगताप
तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात पाण्याचा साठा होणेही तितकेच गरजेचे आहे. कारण महापुरामुळे तालुक्यातील ओढे, नाल्यावरील बंधारे फुटलेले आहेत. तसेच नद्यांवरील बंधारे वाहून गेले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या बंधऱ्यांची दुरुस्ती करायला हवी. अन्यथा एक ते दोन महिन्यांत हे पाणी संपून जाईल व तालुक्याला उन्हाळ्याआधीच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतील.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली कामे देखील या महापुरामध्ये वाहून गेलेली आहेत. त्यामुळे अगोदरच तालुक्याला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. शेतीच्या पाण्याची तर सोयच नसते. मात्र, आता जर प्रशासनाने लवकरात लवकर जलसंधारणासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत तर आहेत ती कामे देखील वाया जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून तालुक्यात जलसंधारणासाठी पुरेशा प्रमाणात कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्यामुळे तालुक्याचा पूर्व भाग हा कायमच दुष्काळात असतो.
पूर्व भागातील काही गावे तर वर्षभर टॅंकरवरती पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असतात. एकंदरीत प्रशासनाचा हलगर्जीपणा भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्याच्या पाण्याकरिता उन्हाळ्यात टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. आता जर वेळीच उपाययोजना करुन फुटलेली बंधारे दुरुस्त केले तर सध्या सुरू असलेल्या पावसाचे पाणी त्यामध्ये साचून कमीत कमी उन्हाळ्यात एखादा महिना तरी ग्रामीण भागातील पुरंदरकरवासीयांना सुखावह होईल.
मात्र, प्रशासनास या गंभीर बाबीचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासन सध्या फक्त निवडणुकीच्या कामांत गुंतलेले दिसून येत आहे. तहसील कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा निवडणूक कामातच आपण अधिक व्यस्त असल्याचे अधिकारी दाखवितात.