भाजपामध्ये एकवाक्यतेचा अभाव : खासदार, मंत्र्यांची परस्परविरोधी वक्तव्ये
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा असलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करू, याचा पुनरुच्चार भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी आज केला. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी “शेवटचा श्वास असेपर्यंत बंद पाईपलाइन होऊ देणार नाही’ अशी घोषणा केल्यानंतर बापट यांच्या या विधानास महत्त्व प्राप्त झाले आहे. खासदार आणि मंत्र्यांच्याविरुद्ध विधानामुळे भाजपामध्ये बंद पाईपलाइनवरून एकवाक्यता नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक भाजपाच्या वतीने मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी बंद जलवाहिनीवर वक्तव्य केले. ते म्हणाले, बंद जलवाहिनी ही शहरासाठी महत्त्वाची असून मावळातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही योजना आम्ही पूर्ण करणार आहोत. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेबाबत विश्वासात घेण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेने या योजनेसाठी असलेली तरतूद दुसरीकडे वर्ग केलेली असताना तसेच ठेकेदाराने हे काम करण्यास असमर्थता दर्शविलेली असताना त्यावर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आजपर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही. तर सध्या राज्यमंत्री व पुण्याचे सहपालकमंत्री असलेल्या बाळा भेगडे यांनी जाहीर सभेत बंद जलवाहिनी योजना होऊ देणार नसल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत वक्तव्य केले होते. त्यानंतर आज बापट यांनी नेमके भेगडे यांच्या विरुद्ध विधान केल्यामुळे भाजपामध्ये या योजनेवरून एकवाक्यता नसल्याचेच पुढे आले आहे. मावळ तालुक्यात योजना होणार नाही म्हणून मते मिळावायची आणि पिंपरी-चिंचवडमध्ये योजना केली जाईल असे आश्वासन देऊन शहरवासियांची मते घ्यायची अशी दुटप्पी भूमिकाच भाजपाकडून राबविली जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
हॉटेल संस्कृती उघड – “आम्ही जेथे काम करतो, तेथेच खातो, आमची पंचतारांकित हॉटेलमध्ये खाण्याची पद्धत नाही’ असे विधान पालकमंत्री यांच्या महापालिकेतील भोजनावळीनंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले होते. आज भाजपाची पिंपरी चौकातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक पार पडली. त्यामुळे राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या पवार यांचे पितळ उघडे पडले असून भाजपाचीही पंचतारांकितच संस्कृती असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
प्राधिकरण सदस्य निवड नाहीच – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर प्राधिकरणावर सदस्यांची निवड केली जाईल असा कयास होता. मात्र अंतर्गत कलह, मतभेद आणि सत्ता स्पर्धेतून सदस्यांची निवड झाली नव्हती. याबाबत गिरीश बापट यांनी कोणतेही वक्तव्य न करता “उशीर झाला’ इतकेच उत्तर दिले.