ग्रामविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश
पुणे – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले. त्यामुळे खबरदार… यापुढे शिक्षकांना गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर किंवा अन्य प्रशासकीय कामे दिली तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आदेशाद्वारे सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे.
राज्यात कोणत्याही योजनेचा प्रसार, जनगणना, निवडणुका यासाठी शिक्षकांना जबाबदारी दिल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत नाही. काही दिवांपूर्वी राज्यातील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन केले. तब्बल 25 दिवस हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे गावातील “गावगाडा’ ठप्प झाला होता. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीमधील कारभार सुरू व्हावा, नागरिकांच्या अडचणी सुटाव्या यासाठी जिल्हा परिषदेकडून गटविकास अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापकांनाही ग्रामविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. ही बाब ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रि. श. कांबळे यांनी हा आदेश दिला.
राज्यात अधीच जिल्हा परिषद शिक्षकांची पुरेशी संख्या दिसून येत नाही. सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, असे असताना शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामांची जबाबदारी देणे गंभीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांना शिकविण्याच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामाची जबाबदारी दिली असेल तर, त्यांना तत्काळ शाळेत परत पाठविण्यात यावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेशामध्ये म्हटले आहे.