टपालखात्याच्या बॅंकिंग सेवेला ग्राहकांचा प्रतिसाद : आंबी जळगाव, म्हसणे, चिंचाळे, नाहूर ठरली सक्षमग्राम
नगर – भारतील टपाल सेवा ही देशभरातल्या अतिदुर्गम भागात सेवा देणारी एकमेव संस्था असा लौकीक असलेली संस्था. मात्र माहिती मायाजालाचं जाळं जसंजसं पसरू लागले तसतसे या टपाल सेवेचं महत्व कमी कमी होवू लागलं. काही वर्षात ही सेवा बंद पडणार अशी भिती व्यक्त होवू लागली. मात्र,राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षा प्रमाणेच या टपाल खात्याने भरारी घेत पुन्हा नव्यानं पंखात बळ भरायला सुरवात केली आहे, ती नेटबॅंकिंगच्या माध्यमातून गेल्यावर्षी 1सप्टेंबरला सुरू करण्यात आलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकेच्या माध्यमातून. या बॅंकेत गेल्या वर्षभरात 54,100पेक्षा जास्त खाती उघडली गेली.
गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने ही बॅंकिंग सुविधा पोस्ट विभागाच्या अंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला.आणि बघता बघता या सेवेला व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या सेवेत खाते उघडण्यासाठी केवळ डाव्या अंग़ठ्याची ,आधारकार्ड आणि त्यावरचा क्यु आर कोडची आवश्यकता आहे.या खात्यातून ग्राहक रोज एक लाख रुपया पर्यंतची उलाढाल करू शकतात. एन ई एफ टी आणि आर ट जी एसच्या माध्यमातून व्यवहार केले जातात.
या बदल्यात आकारले जाणारे बॅंकिंग चार्जेस हे अन्य राष्टीयकृत वा आंतरराष्ट्रीय बॅंकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत.म्हणूनच हे व्यवहार व्यापारी वर्गाला अत्यंत परवडणारे असल्याने रोज किमान 30 ते 40 व्यवहार या माध्यमातून केले जातात.हि आकडेवारी फक्त नगर शाखेची असून नगर विभागात पोस्टाच्या 350 शाखा आहेत,या शाखांमधून 43,100 खाती उघडण्यात आली आहेत. तर श्रीरामपूर शाखेत 308 पोष्टांच्या शाखेतून जवळपास 14,000 खाती उघडली गेली आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक शाखेला दोन सक्षमग्राम योजना राबवायची होतीत्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील दोन्ही शाखेतून ही योजना राबविण्यात आली.पैकी नगर शाखेकडून आंबी जळगाव (कर्जत)आणि म्हसणे (पारनेर येथे तर श्रीरामपूर शाखेतून चिंचाळे (राहुरी)आणि नाहूर (पुणतांब) येथे ही योजना राबवून तेथील प्रत्येक घरातून खाती उघडण्यात आली. पैकी नगर शाखेच्या माध्यमातून म्हसणे येथे 350 तर आंबी जळगाव येथे 525 खाती उघडण्यात आली आहेत.
नुकताच या योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आधार एनेबल पेमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.तसेच किसान सन्मान योजनाही याच बॅंकेतून राबविण्याची सरकारची योजना आहे.त्यासाठी बायोमेट्रीकचा वापरकरण्यात येणार आहे.अशी माहिती वरिष्ट डाक अधीक्षक जे.टी.भोसले यांनी दिली.
मातृवंदना योजनेंतर्गत 8000 खाती
टपाल खात्याच्या माध्यमातून मातृवंदना योजनेंतर्गत 8000 खाती उघडण्यात यश आलं आहे. त्याच बरोबर पोस्टमॅट्रीक स्कॉलरशीपचीही नगर आणि श्रीरामपूर या दोन्ही शाखेतून 4175 खाती उघडण्यात आली असून त्या माध्यमातूनच मातृवंदना योजनेतील गरोदर मातांना दिला जाणारा 6000 रुपयांचा आहारभत्ता, शिष्यवृत्ती योजनेतील रक्कम शिष्यवृत्ती धारकांना दिली जाते.