ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
नवी दिल्ली: पश्चिम बंगालचे नाव बदलून “बांगला’ असे ठेवा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासंबंधी नक्की विचार करु, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. याप्रसंगी त्यांना कुर्ता आणि मिठाई भेट दिली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करत पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली. तसेच मोदींकडे राज्यासाठी 13,500 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच एनआरसी आसाम कराराचा भाग होता. इतर ठिकाणी त्याची तरतूदच नव्हती, याकडेही मोदींचे लक्ष वेधल्याचेही त्या म्हणाल्या.
मी दिल्लीला नेहमी येते. तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत असते. यावेळी अर्थमंत्र्यांशी भेट होऊ शकणार नाही. कारण पश्चिम बंगालचे अर्थमंत्री आलेले नाहीत. मोदींबरोबरची आजची भेट ही राजकीय भेट नव्हती, असे सांगतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. शहा यांनी वेळ दिल्यास उद्या त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रानंतर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर या असे निमंत्रणही दिले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ममता बॅनर्जी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी यांनी एकदा तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानण्यासही नकार दिला होता.