नोव्हेंबर महिन्यात निकाल लागणे अपेक्षित
नवी दिल्ली : प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या जमिनीच्या वादातील सर्व युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 18 ऑक्टोबरची मुदत दिली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणाचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता वाढली आहे. शनिवारीसुद्धा या खटल्याची सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली. त्याचवेळी मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्यास पक्षकारांना मोकळीक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातील हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजूंच्या वकिलांना सांगितले की, 18 ऑक्टोबरपर्यंत दिवसाची सुनावणी संपवायची आहे, जेणेकरून न्यायाधीशांना निर्णय लिहिण्यासाठी जवळपास चार आठवड्यांचा अवधी मिळाला पाहिजे. या खटल्याची सुनावणी करत असलेल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचे अध्यक्ष आणि सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होत असल्याने युक्तिवाद त्यापूर्वीच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवले असल्याचे समजते आहे. मंगळवारी कोर्टाने हिंदू व मुस्लीम पक्षांचे युक्तिवाद संपविण्याच्या अंदाजे कालावधीबद्दल विचारणा केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार, न्यायालयाकडे आता सुनावणी संपण्यास 18 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत हिंदू पक्षांनी 16 दिवस युक्तिवाद केला आहे आणि मुस्लीम पक्षांचे प्रतिनिधीत्व असलेले ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी 10 दिवसांची निवेदने सादर केली आहेत. या प्रकरणातील अपिलांची सुनावणी अत्यंत प्रगतीपथावर आहे, कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहणार आहे. यादरम्यान, पक्षांनी मध्यस्थ समितीच्यामार्फत तडजोड करण्याची इच्छा असेल तर ते तसे करू शकतात. तसा तोडगा काढल्यास कोर्टापुढे मांडू शकतात, असे खंडपीठाने म्हटले आहे.