कोल्हापूर: शेतकऱ्यांवर होते असलेल्या अन्याय, अत्याचाराविरुध्द आवाज उठवण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी मंगळवार, दि. 17 सप्टेंबर रोजी शाहू स्मारक येथे “शेतकरी कर्जमुक्त परिषद’ आयोजित केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
कोल्हापूर येथे आयोजित परिषदेत ते बोलत होते. रघुनाथदादा पाटील म्हणाले, देशाला स्वयंपूर्ण बनवलेल्या शेतकऱ्यांलाच आत्महत्या करावी लागत आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या सर्व सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा इतकाही भाव न दिल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. जिरायती, बागायती, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस करून तसेच दुग्ध व्यवसाय, कुकूटपालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, ससे पालन असे उद्योग करुनही कर्ज न फिटता ते वाढतच चालले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा हा फटका आहे. या सगळ्यातून मुक्ती लढ्यासाठीच ही परिषद आयोजित केली आहे.
तसेच सरसकट सर्व शेतकऱ्यांना पॉलीहाऊस ग्रीन हाऊस सर्व कर्जातून वीज बिलातून मुक्त करावे, शेतकरी विरुद्धचे कायदे रद्द करावेत, आपत्ती निवारण कायदामध्ये दुष्काळाचा आणि महापुराचा समावेश करून जिरायतीसाठी 50 हजार आणि बागायती शेतीला एक लाख नुकसान भरपाई मिळावी, रेडी रेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळावा, पूर बाधित पिकाची पाणीपट्टी रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.