चिखलमय, निसरडा रस्ता : वाहनचालक, पादचारी त्रस्त
वडगाव मावळ – नवलाख उंब्रे (ता.मावळ) येथील नवलाख उंब्रे-करंजविहिरे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून रस्ता, खड्डेमय, चिखलमय, निसरडा काही ठिकाणी ओढ्याचे स्वरूप आल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नवलाख उंब्रे (ता. मावळ) परिसरात औद्योगिक क्षेत्र असून, वार्षिक चार कोटींची उलाढाल असलेल्या नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परिसरात बहुसंख्य कारखाने असल्याने अवजड वाहतूक तसेच कामगार, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या रस्तावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. वाहने नादुरुस्त होऊन बंद पडत आहेत. वाहनाच्या टायरातून दूषित पाणी उडून पादचाऱ्यांच्या अंगावर पडत आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था केली नाही. त्यामुळे पाणी रस्त्यामध्ये साचत आहे. रस्त्यातील खड्डे चुकविताना अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची एचपीसीएल गॅस लाईनसाठी वारंवार खोदकाम केल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. एमपीएससी कंपनीने नवलाख उंब्रे ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी बंद केली आहे. त्वरित रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केली आहे.