शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांचा विश्वास : सावित्रीबाई फुले स्मारक येथे मेळावा
पुणे -“शिस्तीशिवाय कोणताही पक्ष मोठा होत नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्व आघाड्यांना एकत्र आणून काम करावे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) आमदार निवडून आणायचे आहेत. पुण्यातही “रिपाइं’ने तीन जागांची मागणी केली आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले त्याबाबत निर्णय घेतील. परंतु, आपल्याला मिळणाऱ्या जागेवर शहरातून “रिपाइं’चा आमदार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार पक्षाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी केला.
गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात रविवारी आयोजिलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिरोळे बोलत होते. प्रसंगी रिपब्लिन पक्षाचे नेते एम. डी. शेवाळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, गंगाधर आंबेडकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुब शेख, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, प्रियदर्शिनी निकाळजे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, फरझाना शेख, स्वीकृत नगरसेवक संजय कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
एम.डी. शेवाळे म्हणाले, “आम्ही आमच्या काळात कार्यकर्त्यांच्या वसाहती वाचवण्यासाठी मोठे आंदोलन छेडले होते. कोणालाही न जुमानता आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वसाहती वाचवल्या. गोरगरिबांच्या प्रश्नासाठी आम्ही काम करत आहोत. मतभेद असायला हरकत नाही, पण मनभेद असू नयेत. पक्षीय पातळीवर आपली एकी आपल्या प्रतिनिधित्व देऊ शकेल. सध्या आपला पक्ष सत्तेजवळ आहे. पण आपले प्रतिनिधित्व आणि सत्तेचा वाटा वाढविण्यासाठी आपण मेहनत घ्यायला हवी.’