जिल्ह्यातील साडेआठशे कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग
सातारा – शासनाकडे पाठपुरावा करूनही विविध मागण्या प्रलंबित असल्याने शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी महसूल कर्मचारी संघटनेच्या साडेआठशे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले. परिणामी सातारा जिल्ह्यात वर्ग दोन व वर्ग तीन चे कर्मचारी नसल्याने कामकाज ठप्प झाले होते.
अठरा मागण्या मान्य न झाल्यास पाच सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानुसार अनुपस्थिती दर्शवून महसूल कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधून घेतले. मध्यवर्ती संघटनेने 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. मात्र, मागण्यांवर काहीच प्रतिक्रिया न आल्याने गुरुवारी पुन्हा बंद आंदोलनाला सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदार तसेच तलाठी सज्जांचे कामकाज संपामुळे बंद राहिले.
ही बेमुदत संपाची पूर्वतयारी केली जात आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर कारंडे यांनी दिली.शासनाचे कर्मचारीविरोधी धोरण व अनास्थेविरुध्द राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून राज्यव्यापी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली होती. मात्र, शासन अजूनही सकारात्मक भूमिका घेत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचे कारंडे यांनी सांगितले होते. त्यानुसार या संपात जिल्ह्यातील 100 टक्के कर्मचारी सहभागी होणार असून, तालुकानिहाय द्वारसभा घेण्यात येणार आहेत, जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकजूटीने संप करण्यासाठी सज्ज असून, या संपाला इतर सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही कारंडे यांनी केला.