बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर अद्याप कोरडा : पावसाने पाठ फिरविल्याने परिणाम
पुणे -जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला. परंतु, पूर्व भागातील बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात पावसाने निम्मीही सरासरी गाठली नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या तालुक्यातील 83 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी 42 टॅंकर सुरू होते. परंतु, पावसाची कृपादृष्टी होत नसल्यामुळे मागील 8 दिवसांत बारामती आणि पुरंदरमध्ये पुन्हा एकूण 8 टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे.
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचे मोठे संकट प्रशासनासमोर उभे राहिले. जून 2019 अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल साडेतीनशेहून अधिक टॅंकरच्या मदतीने लाखो नागरिकांची तहान भागविली जात होती. त्यानंतर पावसाला सुरवात झाली आणि टॅंकरची संख्या झपाट्याने कमी झाली. जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील 8 तालुके टॅंकरमुक्त झाले. मावळ तालुक्यात टॅंकर सुरू करण्याची वेळ आली नाही. तर 8 दिवसांपूर्वी केवळ बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या 4 तालुक्यांत टॅंकर सुरू होते. त्यामध्ये 42 टॅंकरद्वारे 37 गावे आणि 255 वाड्या वस्त्यांवरील साधारण 83 हजार
नागरिकांना पाणीपुरवठा
सुरू होता. परंतु, या तालुक्यांमध्ये अजूनही पाऊस झाला नाही, तलाव कोरडी पडली आहेत. त्यामुळे वस्ती भागावारील गावांची पुन्हा पाण्याची पायपीट सुरू झाली. अशा परिस्थितीत आमच्या गावातील टॅंकर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांकडून येत आहे.
17 हजार नागरिकांना पाणीपुरवठा
मागील 8 दिवसांत 3 गावे आणि 41 वाड्यावस्त्यांवरील 17 हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुरंदरमध्ये 5 तर बारामतीमध्ये 2 टॅंकर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये टॅंकरची एकूण संख्या 11, बारामतीमध्ये 15 तसेच आंबेगावमध्ये 1, इंदापूरमध्ये 14 आणि दौंड येथे 9 असे एकूण 50 टॅंकर सुरू झाले आहेत.