पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दरवर्षी स्वत:च्याच वसुलीचे विक्रम रचणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यंदाही भरघोस उत्पन्नाचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 44 हजार 681 कोटींचा महसूल मिळाला होता.
आता 2023-24 या वर्षात नोंदणी विभागाकडे 47 हजार 438 कोटींचा महसूल जमा झाला आहे. दरम्यान, नोंदणी विभागाला यंदा शासनाने 50 हजार कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले असून 31 मार्च अखेरपर्यंत त्यासाठीची मुदत आहे. त्यामुळे यंदा नोंदणी विभाग 50 हजार कोटींचा टप्पा पार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
राज्याला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. राज्यातील शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेही नोंदणी विभागात मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला.
जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध होणाऱ्या करांच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे कर जमा होतो. रेडी रेकनरच्या माध्यमातून शासन दरवर्षी दि.1 एप्रिल रोजी स्थावर मालमत्तेचे दर जाहीर करत असते. ती किंमत कर आकारणीची किमान आधारभूत रक्कम मानली जाते. मुद्रांक शुल्कापोटी जमा कर हा शासनाच्या तिजोरीत जमा होत असतो.
राज्यातील विकासकामांना मिळतो निधी
यंदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुका होत आहे. तर पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे या वर्षात शासनाकडून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या. तसेच सढळहाताने विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. तसेच शासनाकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत.
रस्ते, सिंचन प्रकल्प, मेट्रो प्रकल्प आदींबरोबर विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहे. विविध कामे तसेच विविध प्रकल्पांसाठी शासनालाही मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. जमा होणाऱ्या महसूलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा याचा निर्णय होत असतो.
आर्थिक वर्ष – दस्त संख्या – जमा महसूल
2021-22 – 23,83,712 – 35 हजार 171 कोटी
2022-23 – 25,76,536 – 44 हजार 681 कोटी
2023-24 – 27,59,098 -47 हजार 438 कोटी (दि.25 मार्च अखेर)
दस्तनोंदणीच्या संख्येत वाढ
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दस्तनोंदणीमध्ये 1 लाख 82 हजार 562 दस्तांची भर पडली आहे.मागील आर्थिक वर्षात 25 लाख 76 हजार 536 दस्त नोंदविले गेले होते. यंदा दि.25 मार्च अखेरपर्यंत राज्यात 27 लाख 59 हजार इतके दस्त नोंदविले गेले आहेत.