गावात ऊसक्षेत्र घटून गहू, कपाशीबरोबरच चारा पिकाचे क्षेत्र वाढले
अनिल देशपांडे
राहुरी – कोंढवड या मुळा नदीकाठावर असलेल्या गावात गेल्या तीन दशकात एकदम बदल झाला आहे. उसाचे आगार असलेल्या व त्यावेळी सुमारे वीस हजार मेट्रीक टन उसाचा पुरवठा करणाऱ्या या गावात आज पाचशे ते हजार मेट्रीक टन देखील ऊस नाही. उसाची जागा गहू, कपाशीने घेतली असून चारा पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. दररोज सुमारे सात हजार लिटरपेक्षाही अधिक दूधसंकलन होत असून उसाची जागा दूधानेच घेतली आहे.
गावाचा शिवार साडेसातशे हेक्टर आहे. वाहणारी मुळा नदी, विहिरीतील पाण्याची उपलब्धता, यामुळे उसाखालील क्षेत्र सर्वाधिक होते. अगदी नव्वद टक्के क्षेत्र उसाखालील होते. राहुरी सहकारी साखर कारखान्यास वर्षाकाठी वीस हजार मेट्रीक टन ऊस पुरवठा करणारे हे गाव होते. गावाचे हे स्थान खालावत चाललेल्या पाणी पातळीने बिघडले. मुळा नदीकाठाचा प्रंचड वाळू उपसा झाला. नदीकाठाची पाणी धारण क्षमता पूर्णपणे संपली. ऊसाची शेती उद्ध्वस्त झाली. आज नदीपात्रातील विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी नाही. बारमाही ऊस घेणे शक्यच नाही. परिणामी उसाखालील क्षेत्र आज अवघ्या पाच ते दहा टक्केवर आले आहे. वीस हजार मे. टन ऊस पुरविणारे गावाने गत हंगामात जेमतेम पाचशे ते हजार मेट्रीक टनच उस उत्पादित केला.
यंदाही तीच स्थिती आहे.
ऊस पुरवठादारांची संख्या जेमतेम हाताचे बोटावर मोजण्या एवढीच आहे. राहिलेला ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठीच वापरला जाईल. ऊसाचे क्षेत्र गहू, कपाशीखाली आले असून चारा पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. तीन दशकापूर्वी सातशे लिटर असणारे दूध संकलन सात हजाराचे आसपास पोहोचले आहे. दररोज सव्वा ते दीड लाखाचे दूध उत्पादित होत आहे. ऊसाची जागा दूधाने घेतली असून खासगी दूध संकलनामुळे दूध व्यवसायातील आर्थिक उलाढाल वाढली आहे. ऐंशीच्या दशकात ऊसाची वार्षिक उलाढाल वीस ते पंचवीस कोटीच्या घरात होती. आज दुधाची उलाढाल सत्तर ते ऐंशी कोटीच्या घरात गेली आहे. उसापेक्षाही दुधाची उलाढाल अनेक पटीने वाढली आहे.