पुणे – गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक गणेश मंडळाच्या आवारात निर्माण होणारे निर्माल्याच्या संकलनासाठी मंडळ आवारात निर्माल्य कलश (80 लिटर क्षमतेची बकेट) ठेवला जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी परवाना घेणाऱ्या प्रत्येक मंडळाला हे कलश पालिकेकडून देण्यात येणार असून निर्माल्य संकलनाचे खत तयार केले जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. गेल्या काही वर्षांत विसर्जन घाट तसेच हौदांच्या ठिकाणी आवाहन करून महापालिका हे निर्माल्य संकलन करते. मात्र, या वर्षीपासून आता थेट गणेशमंडळांनाही यात सहभागी करून घेतले जात आहे. भाविकांकडून नदी संवर्धनासाठी निर्माल्य महापालिकेच्या यंत्रणेकडेच द्यावे, यासाठीही जनजागृती केली जाणार आहे.
पाषाण तलाव परिसरात खत प्रकल्प
या निर्माल्यापासून खत तयार करण्यासाठी पाषाण तलाव परिसरात महापालिकेने व्यवस्था केली आहे. कमिन्स इंडिया, स्वच्छ संस्था अणि महापालिका हा संयुक्त प्रकल्प राबविणार आहेत. मागील वर्षी 586 टन निर्माल्य संकलन झाले होते. त्यातील सुमारे 385 टन निर्माल्य खत करण्यासाठी वापरण्यात आले असून त्यातून 65 टन खत तयार झाले होते. ते शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आले होते. या वर्षीही अशाच प्रकारे खत प्रकल्प राबविला जाणार आहे.
महापालिकेकडून गणेश मंडळांना निर्माल्य कलश ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे परवानाधारक सर्व मंडळांबाहेर हे कलश ठेवले जातील. अन्य भाविकांनीही निर्माल्य नदीत न टाकता या कलशांचा वापर करावा.
– ज्ञानेश्वर मोळक, विभाग प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन