कृषी : भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन
पवनानगर – मावळ कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान 2019-20 अंतर्गत पवन मावळातील भडवली गावात “क्रॉपसॅप’ संलग्न शेतकरी शेतीशाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भडवली गावातील भैरवनाथ मंदिरात ही शेतीशाळा भरविण्यात आली होती.
शेतीशाळेचे एकूण 10 वर्ग असून, त्यापैकी सातवा वर्ग घेण्यात आला. यावेळी सहायक कृषी अधिकारी दत्तात्रय गावडे, विकास गोसावी, कृषी अधिकारी धनंजय पाटील तसेच चारसूत्री पद्धतीने भात लागवड केलेले व अन्य शेतकरी असे एकूण 25 लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
या शेती शाळेच्या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना संगणकाच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे भात पिकाला प्रादुर्भाव करणारे रोग, नुकसानकारक कीड व मित्रकीटक या घटकांची माहिती सहायक कृषी अधिकारी दत्तात्रय गावडे यांनी माहिती दिली. यापूर्वीच्या शेतीशाळा वर्गांमध्ये भाताच्या वाणांची ओळख, योग्य बियाण्याची निवड, बीजप्रक्रिया, गादी वाफ्यावर भात रोपवाटिका तयार करणे, तसेच चारसूत्री पद्धतीने नियंत्रित लागवड करणे अशा विविध विषयांचे विविध टप्प्यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
ही शेतीशाळा ही “क्रॉपसॅप’ संलग्न असल्याने गावातील निवडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या चारसूत्री पद्धतीच्या भात लागवड प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये दोन कामगंध सापळे कृषी विभागाने लावलेले आहेत. त्यामध्ये खोडकिडा या किडीचा नर हा सापळा लावून पकडला जातो, त्यावरून खोड किडीचे नियंत्रण करता येते. तसेच या शेतीशाळेसाठी मावळ कृषी विभागाकडून 25 लाभार्थी शेतकऱ्यांना शेती उपयोगी कीट (साहित्य) वाटप केले असल्याचे कृषी पर्यवेक्षक अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी
सद्यस्थितीत पावसाने विश्रांती घेतली असल्याने भात पिकावरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करपा व कडा करपा रोग तसेच खोडकिडा व पाने गुंडाळणारी आळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने तत्काळ फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले आहे.