पिंपरी – “”आज ई-पुस्तके जरी निघाली असली तरी प्रत्यक्षात हाती असलेल्या पुस्तकातून वाचताना मिळणारा आनंद हा ई-पुस्तकातून मिळत नाही. वाचन संस्कृती वाढविणे ही काळाची गरज आहे”, असे मत डॉ. सुभाष आहेर यांनी चिंचवड-बिजलीनगर येथे नुकतेच व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने आयोजित “पुस्तकावर बोलू काही’ कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. आहेर बोलत होते. “मसाप’च्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे आदी उपस्थित होते.
संत तुकाराम यांच्यावर आधारित “हेचि दान देगा देवा’ अण्णाभाऊ साठे यांची “फकिरा’ ही कादंबरी, स्त्री जीवनावर आधारित विविध कथांचा संग्रह “तिच्या कथा’, “सारीपाट’ हे नाटक, “कोणा एकाची भ्रमणकथा’, “ययाती’ कादंबरी, “पडघवली’ हा आत्मसंवाद, मलाला यांच्यावर आधारित काव्यसंग्रह आदी विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांवर प्रिया जोग, बी. एस. बनसोडे, अश्विनी रानडे, रुचिता देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, जालिंदर राऊत, पंचशीला गायकवाड, मंगला पाटसकर, नंदा करंदीकर, निर्मला वाल्हेकर आदी लेखक व कवींनी अभिप्राय मांडले. डॉ मुगळीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात संभाजी बारणे, संजय जगताप, लेखक नितीन सुतार आणि विनिता ऐनापुरे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रजनी शेठ, किरण लाखे, विनोद गायकवाड यांनी संयोजन केले. लाखे यांनी प्रास्ताविक केले. जगताप यांनी सूत्रसंचालन केले.