पुणे – जुलै आणि ऑगस्टमध्ये जोरदार बरसल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता स्कायमेट या हवामानविषयक संस्थेने व्यक्त केली आहे.
यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने राज्यासह देशात सर्वत्र चांगली बरसात केली. सांगली, कोल्हापूरसह कोकणात सुद्धा अतिवृष्टी झाली. तर, राजस्थानसह मध्य प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरस्थिती होती. जुलै, ऑगस्टच्या पावसाची सरासरी पाहता देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
दरम्यान, आता मान्सूनचा शेवटचा महिना म्हणजे सप्टेंबर असतो. राजस्थान येथून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा अखेरच्या टप्प्यात तो चांगला बरसरणार असल्याचे भाकित “स्कायमेट’ने वर्तविले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, विषवृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या तापमानात सतत घसरण होत असल्याने एल-निनो या मान्सूनच्या काळात फारसा प्रभावशाली ठरणार नाही.