प्रा. डी. के. वैद्य
भांगरे समर्थक बेचैन; पिचडांच्या विरोधात लढण्याची तयारी
अकोले – भाजपच्या मेगा भरतीत अकोल्याच्या राजकारणावर गेली चाळीस वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या माजीमंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव भाजपच्या गळाला लागले. एकीकडे पक्ष दीर्घ राजकारणाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीमुळे पक्ष समृद्ध होण्याची अपेक्षा असताना शिस्तीच्या पक्षातच आता बंडाचे निशाण रोवले गेले आहे. पिचड पितापुत्रांच्या पक्षप्रवेश अनेकांनी शिरसावंद्य मानला.
“साहेब अन् भाऊ हाच आमचा पक्ष’ हा नारा लगावून असंख्य कार्यकर्त्यांनी पिचड पिता पुत्रांची वाट चोखाळली. त्यात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, व असंख्य कार्यकर्त्यांचा त्यात अंतर्भाव आहे.
पण हे घडत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे मात्र दुखावले आहेत. भांगरे-पिचड हे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गेले अनेक वर्षे पिचड यांच्या विरोधात विविध पक्षांची उमेदवारी घेऊन अशोक भांगरेंनी पिचडांना जोरदार सामना दिला. भाजपमध्ये स्थिरावत असताना व पक्ष विधानसभा उमेदवारीची स्वप्ने पाहत असताना पिचड नावाचे विरोधक स्वपक्षात आल्याने त्यांच्या दृष्टीने ते संकट ठरले आहेत. त्यामुळे भांगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पिचडांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशा प्रकारचा आग्रह धरला. पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री व इतर मंत्र्यांचे त्यांनी उंबरठे झिजवले. परंतु त्यांच्या पदरी आतापर्यंत तरी यश आलेले नाही.
ही बाब लक्षात घेवून भांगरे यांनी पिचड यांच्या विरोधात 30 जुलै रोजी आदिवासी नेत्यांना एकत्र करून अकोले येथे पिचड विरोधी मोर्चाचे आयोजन केले होते. त्या लागोपाठ दहा दिवसाच्या अंतरात आदिवासी क्रांतिदिनी 9 ऑगस्टला पुन्हा एकदा अकोल्यात मोर्चा काढून पिचडांना त्यांनी लाखोल्या वाहिल्या. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. तर शहापूर येथेही त्यांनी मोर्चा काढून पिचड यांच्या विरोधातील आपला पवित्रा कायम ठेवला. पिचडांना विरोध कायम ठेवून त्यांनी सरकारलाही पेचात अडकवले. स्वपक्षाच्या विरोधात पवित्रा घेतला आणि पिचड यांच्या चौकशीची जाहीर मागणी करून बंडाचे निशाण रोवले आहे.
दरम्यान, त्यांनी एवढ्यावर स्वस्थता मानलेली नाही. तर आपली पत्नी जिल्हा परिषद सदस्य सुनीता यांना अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार गाठीभेटीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले. सुनीता या जवळेबाळेश्वर (तालुका संगमनेर येथील कारेवाडी-बांगरवाडीच्या सुकन्या आहेत. त्यामुळे सुनीता यांनी आपल्या माहेरच्या पठार भागाला भेटी देण्यावर विशेष जोर दिला आहे. त्यांच्याबरोबर अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात त्यांनी भेटीगाठी तर घेतल्याच पण पूर्व भागातही त्यांनी आपला संपर्क कायम ठेवला आहे.
पक्षाच्या विरोधात अशोकराव व सुनीता भांगरे यांचा बंडाचा पवित्रा मान्य करून त्यांचे बंधू व शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे याच भागातील पक्षाचे ज्येष्ठ नेते काशिनाथ नागू साबळे, मुरलीधर नाना भांगरे, धनंजय संत, नितीन जोशी, शरद कोंडार, नितीन बेनके, सुनील दराडे, विकास बंगाळ, योगेश नाईकवाडी, राजेश नवले, दिनेशकुमार शहा आदींनी पक्षाविरोधात पवित्रा घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पिचड विरुद्ध भांगरे अशी पारंपरिक राजकीय लढाई याही वेळी रंगणार असल्याचे बोलले जाते आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना समांतर अंतरावर ठेवून चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे पिचड – भांगरे -लहामटे अशी तिरंगी लढत होण्याची राजकीय वर्तुळात चर्चाही रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे.