अरुण गोखले
नेहमीचा परिपाठ झाला आणि मुख्याध्यापक माळवे सर बोलायला उभे राहिले. ते म्हणाले “”मुलांनो! आजच्या “थोरांची ओळख’ या विषयात आपण विजेच्या दिव्याचा शोध लावणाऱ्या थॉमस एल्वा ऍडिसन यांची माहिती ऐकली. होय ना? त्या माहितीवरून आपण काय शिकायचे? कोणता बोध घ्यायचा? तर नेहमी आपण आपल्या विचारांची दिशा ही सकारात्मक ठेवली पाहिजे.”
त्याच काय आहे माणसाच्या मनात रोज हजारो विचार येतजात असतात. त्या विचारांचा त्याच्या मनावर, कृतीवर, वागण्यावर परिणाम होत असतो. जसे विचार तसे आचरण. त्याचा परिणाम म्हणजे जीवनात वाट्याला येणारा आनंद किंवा दु:ख.
मनात येणाऱ्या विचारांमध्ये अनेक वेळा नकारात्मक विचारांचे प्रमाण हेच जास्त असते. असे विचार जास्त प्रभावी असतात. त्यामुळे आपल्याला नैराश्य येते, खचून गेल्यासारखे होते आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. आपण आपले प्रयत्न अर्ध्यातच सोडून देतो. हे होणार नाही याकडे जागरुकतेने लक्ष द्यायला हवे.
जेव्हा ऍडिसनचे 999 प्रयोग फसले, तेव्हाही तो खचला नाही. निराश झाला नाही. त्याने आपले प्रामाणिक प्रयत्न सोडले नाहीत. त्याने त्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता माझे हे आजवरचे प्रयोग वाया गेले नाहीत तर उलट मी जगाला हे सिद्ध करून दाखविले की या 999 मार्गांनी प्रयत्न केले तरी दिवा लागणार नाही. त्याचा मार्ग, पद्धती काही तरी वेगळी आहे, आणि मला ती शोधली पाहिजे, हा आहे सकारात्मक दृष्टीकोन.
मुलांनो! मला तुम्हाला हेच सांगायच आहे की जीवनात अपयश आले, एखादी गोष्ट साध्य झाली नाही, हवी असणारी गोष्ट मिळाली नाही तर त्यासाठी निराश होऊ नका, नकारात्मक विचार करू नका. मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, मी हे करू शकणार नाही, असे विचार मनात आणू नका. तर मी हे करणार, मी हे शिकणार, हे मिळवणारच… या जिद्दीने, उमेदीने प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागणारा संघर्ष करा. प्रयत्न करा. जो प्रयत्न करतो त्यालाच सिद्धी प्राप्त होते. सकारात्मक विचार ही प्रयत्नांची ऊर्जा आहे. त्यासाठी लक्षात ठेवा बी पोझिटीव्ह ऍन्ड थिन्क पॉझिटीव्ह.
माळवे सरांच्या भाषणाने मुलांबरोबर आम्हा इतर शिक्षकांनाही जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली.