मुंबई : राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दिवसभरतात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यातून आयोजकांनी आपले सामाजिक भान जपल्याचे दिसत आहे.
#WATCH: ‘Aarti’ being performed at Krishna Janmabhoomi Temple in Mathura on #Janmashtami. pic.twitter.com/gntrKAKTyL
— ANI UP (@ANINewsUP) August 24, 2019
देशातील विविध श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण ‘जन्मभूमी’ असलेल्या मथुरेतील मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात जन्माष्टमी साजरी केली. यावेळी त्यांनी उपस्थित लहान मुलांसोबत गप्पा सुद्धा मारल्या आणि मुलांना प्रसादाचे वाटप केले. याचबरोबर मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात देखील जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय, देशातील केरळ, दिल्ली, जम्मू, गुजरातमध्ये सुद्धा जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.