मुंबई: राज्यातल्या पुरस्थितीमुळे काही काळ स्थगित करण्यात आलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 21 ऑगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांची ही यात्रा 1 ऑगस्ट रोजी अमरावतीहून सुरू झाली होती. त्यानंतर ती 6 ऑगस्टला स्थगित करण्यात आली होती. पण आता ती यात्रा पुन्हा हाती घेण्यात येत असल्याची माहिती भाजपचे या यात्रेचे प्रमुख संघटक सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
त्यांच्या यात्रेच्या नव्या कार्यक्रमानुसार त्यांच्या यात्रेतून कोल्हापुर, पुणे, सांगली आणि सातारा हे जिल्हे वगळण्यात आले आहेत. या आधीच्या नियोजनानुसार मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार होता. या यात्रेवर विरोधकांकडून या आधीच टीका करण्यात आली आहे. राज्य सरकारने काम केले असते तर मुख्यमंत्र्यांना अशा यात्रा काढण्याची वेळच आली नसती अशी टीका विरोधकांनी केली आहे. तथापी केलेल्या कामांची माहिती देण्यासाठीच ही यात्रा काढली जात असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.