पुणे – राज्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे दळणवळणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी पदविका आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा) प्रवेशास मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयने (डीटीई) घेतला आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ते “डीटीई’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दहावी व बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम व थेट द्वितीय वर्ष एसएससी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अशा तीनही पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमांचे तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांनी दि. 9 ऑगस्टपर्यंत लगतच्या “एआरसी’ केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या मुदतीत प्रवेश घेता आले नाही. त्यामुळे आता तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश निश्चितीसाठी 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, तीनही अभ्यासक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रियेचा अंतिम तारीखही वाढविण्यात आली आहे. यापूर्वी सर्व प्रवेशप्रक्रिया 19 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संस्थांना देण्यात आल्या होत्या.