नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जात भारतासोबतचे सर्व संबंध तोडण्याचे सत्र पाकिस्तानने सुरू केले आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या थर एक्स्प्रेस व समझौता एक्स्प्रेस या रेल्वेगाडया बंद करण्याची घोषणा पाकिस्तानने यापूर्वीच केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने लाहोर-दिल्ली मैत्री बससेवा बंद करण्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानचे दूरसंचार व टपालसेवा मंत्री मुराद सईद यांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षा समितीची जी बैठक झाली होती त्यातील निर्णयांच्या अनुषंगाने लाहोर-दिल्ली बससेवा बंद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. लाहोर-दिल्ली बससेवा ही फेब्रुवारी 1999 मध्ये सुरू करण्यात आली होती पण 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ती बंद करण्यात आली. नंतर जुलै 2003 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती.