वाघळवाडी – वीर धरण व भाटघर धरण क्षेत्रात मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली; त्यामुळे धरणं शंभर टक्के भरली. पाऊस संततधार पडत होता, त्यामुळे सोमवार (दि.5) पहाटे 6:30 वाजता वीर धरणातून एक लाख पाच हजार क्युसेक पाणी नीरा नदीमध्ये विसर्ग करण्यात आले होत, त्यामुळे बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये निंबुत, मुरूम, होळ, कोऱ्हाळे खुर्द, लाटे, सांगवी येथे निरा नदीकाठच्या गावांना महापुराचा फटका बसला. या गावांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले. यातून वाहतुकीवरही परिणाम झाला. नदीकाठच्या शेतांतील बाजरी, सोयाबीन, कांदापीक महापुरामुळे मातीमोल झाले.
या सर्व पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पूराच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी उरली सुरली पिके काढून, हाताला काही लागते का, या विवंचनेत शेतकरी आहे.
नीरामाईचे पाणी हळहळू ओसरू लागले आहे. पाण्याचा प्रवाही कमी झाला आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलेले पाणी कमी होत आहे. महापुरामुळे वाहून आलेला गाळ, कचरा, राडारोडा यामुळे झालेले शेतीचे नुकसान यातून शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.
सर्व पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस, टोमॅटो अशी पीके हाता तोंडाला आली असताना पूरात या पीकांचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विद्युत खांब वाकल्याने शेतीच्या पंपाचा वीजपुरवठाही बंद आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून या सर्व गोष्टी मार्गी लावणे गरजेचे आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत, नुकसान भरपाई मिळावी, अशी आशा आता शेतकऱ्याला लागली आहे.