दोन्ही राज्यांत आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू
बंगळूर – केरळ आणि कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमधील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. पाऊस, पुराचा तडाखा आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये त्या दोन राज्यांमध्ये मिळून आतापर्यंत 66 जण मृत्युमुखी पडले आहेत.
केरळच्या 8 जिल्ह्यांना पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. त्या जिल्ह्यांत मागील काही दिवसांत दरडी कोसळण्याच्या तब्बल 80 घटना घडल्या. केरळमध्ये नैसर्गिक आपत्तीने 8 ऑगस्टपासून 42 जणांचा बळी घेतला आहे.
वायनाडसह काही भागांत कोसळलेल्या दरडींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळमधील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. कोची विमानतळावरील स्थगित करण्यात आलेल्या विमानांच्या उड्डाणांना आता उद्यापासून हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
कर्नाटकात पूर आणि पाऊसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत आतापर्यंत 24 जण दगावले आहेत. त्या राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पूरस्थितीचे वर्णन 45 वर्षांतील सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती अशा शब्दांत केले आहे. पाऊस आणि पुरामुळे 6 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्या राज्यात पुढील काही दिवसांसाठी काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.