पुणे – चांगल्या पावसामुळे यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला, ही चांगली बाब आहे. मात्र, पुढील काळासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचे वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
धरणसाखळी परिसरात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून, त्यामुळे पुणेकर सुखावले आहेत. मात्र, एकीकडे धरणातील पाणीसाठा वाढण्याचा आनंद व्यक्त करतानाच दुसरीकडे या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नदीस्वच्छतेविषयी काम करणाऱ्या शैलजा देशपांडे याबाबत म्हणाल्या, “यावर्षी झालेल्या दमदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून दुर्लभ झालेली खळळणारी नदीदेखील पुणेकरांना पहायला मिळाली. हे सर्व आनंददायी असतानाच पाण्याचा योग्य नियोजनाबाबतही आतापासूनच प्रयत्न झाले पाहिजे. अन्यथा पाण्याच्या अतिवापरामुळे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासेल.’
दरवर्षी पावसाळ्यात धरणे भरतात. मात्र, त्यानंतर पाण्याच्या अतिरेकी वापर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आपण नुकतीच अनुभवली आहे. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आतापासूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे.
– रवींद्र सिन्हा, पाणी प्रश्नाचे अभ्यासक