नवी दिल्ली – भारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने देशभरातील आपली 3 जी सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. याची सुरूवातही कंपनीने कोलकाता पासून सुरू केली आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सर्वत्र ही सेवा बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 3 जी सेवा बंद करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात देखील झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
एअरटेल कंपनी सध्या प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. परिणामी काही दिवसांपूर्वीच कंपनीने ग्राहकांना दणका देताना इनकमिंग व्हॉइस कॉल्सची वैधता कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता 3 जी सेवा बंद करण्याचा निर्णय देखील प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्याच्या आणि सेवेतील गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने घेण्यात आल्याची माहिती आहे. कोलकात्यामधून ही सेवा बंद करण्यास कंपनीने सुरूवात केली आहे.
एअरटेलवर ग्राहक नाराज
एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना इनकमिंग कॉल सुरू ठेवण्यासाठी आता आधीपेक्षा लवकर रिचार्ज करावं लागणार आहे. एअरटेलने किमान रिचार्ज स्कीममध्ये बदल केला आहे. हे केवळ प्रीपेड रिचार्जसाठी लागू असणार आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनची सुरूवात 23 रुपयांपासून आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून कॉलिंगसाठी वेगळं रिचार्ज करावं लागतं. दरम्यान, खिशावर थेट भूर्दंड पडणार असल्याने एअरटेलच्या इनकमिंग कॉलच्या नव्या नियमाबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.