उरूळी कांचन परिसरातील अनेक गावांमधील स्थिती : बस फेऱ्या घटविल्याने प्रवासी बेहाल
सोरतापवाडी – पीएमपीएएल प्रशासनाकडून हडपसर ते उरूळी कांचनपर्यंत बससेवा सुरू आहे. या मार्गावरील फेऱ्या कमी पडत असल्याचे अनेक गावांतील नागरिक, चाकरमानी, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेक गावांतील महाविद्यालयीन विद्यार्थी हे बसला लोंबकळून जीवघेणा प्रवास करीत आहेत. त्यामुळे पालकांतून चिंतेचे सूर उमटले आहेत.
हडपसर ते उरुळी काचंनपर्यंत कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरूळी कांचनसह अनेक गावातील नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग दररोज बसने प्रवास करीत आहेत. हा प्रवास यातनामय झाला आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. हडपसर ते उरुळी कांचन असा प्रवास धोकादायक झाला आहे. अगोदरच पुणे सोलापूर महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणूनच ओळखला जात आहे. परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उरुळी ते हडपसर धोकादायक पद्धतीने बसने प्रवास करीत आहेत. उरुळी कांचन ते हडपसर यादरम्यान अनेक गावांमधून दररोज हजारो विद्यार्थी पावसाळ्यात बसला लोंबकळत जात आहेत. जिथे जागा मिळेल, तिथे उभे राहून हा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
बसच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. अनेक फेऱ्या महाविद्यालयीन वेळेत नाहीत. त्यामुळे एखादीच बस विद्यार्थ्यांना मिळते. ती चुकली तर महाविद्यालयात जाण्याची वेळ चुकते. महिन्याचा पास काढून किंवा तिकिटाचे पैसे मोजून बसण्यास जागा मिळत नाही. बसला लटकून गेले तरी पैसे हे द्यावेच लागतात. त्यामुळे बसच्या सकाळी व संध्याकाळी फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे. भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी म्हणाल्या की, लवकरच महापौर व पीएमपीएएल विभाग प्रमुख यांना निवेदन देणार आहोत. सकाळी व संध्याकाळी बसच्या फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न
करणार आहे.